महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीही याच पावलावर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला लगावला.
काँग्रेसचीही भूमिका बदलत असून, राहुल आणि प्रियंका गांधी देवळात जाऊ लागले आहेत. तर, आपचे नेते अरविंद केजरीवालांनीही हनुमान चालीसा पाठ केला आहे. हे सर्व पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक पक्ष खूष होईल. कारण, हिंदू हा केवळ धर्म नसून संस्कृती आहे. ज्यांची भूमिका आमच्याशी जुळते त्या सगळ्यांनाच आम्ही बरोबर घेऊन जातो, असे म्हणत पाटील यांनी आगामी काळाती भाजप-मनसेच्या संभाव्य युतीची शक्यता बोलून दाखविली.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पाटील यांनी राज ठाकरेंच्या मुंबईतील मोर्चाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे महापालिकेतील आगामी निवडणुकांमध्ये काही समीकरणे बदललेली दिसतील का, यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘लगेचच याबाबत काही सांगण्यात मी काही भविष्यकार नाही. मात्र, ठाकरे यांनी मांडलेली भूमिका सध्या काँग्रेस, ‘आप’ यांच्यामध्येही बदलताना दिसते आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाला आवश्यक असून, हे म्हणणारे सगळेच हिंदू आहेत. ज्यांची भूमिका आमच्याशी जुळते त्या सगळ्यांनाच आम्ही बरोबर घेऊन जातो.’ आगामी काळात ‘मनसे’ने परप्रातियांबाबतची भूमिका बदलली, तर भाजप-मनसे एकत्र दिसू शकतील, अशी शक्यताही पाटील यांनी व्यक्त केली.
हिंगणघाट येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्याा महिलेला पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चांगले काम करत असले, तरी मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी गृहखाते आपल्याकडे घ्यावे, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली.
‘अजित पवार मंत्रिमंडळात एक म्हणतात, तर त्यांचे सहकारी मंत्री दुसरे म्हणतात, असे प्रकार घडू लागले आहेत. या सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यवहारात न येणाऱ्या घोषणा करून सरकारला अडचणीत आणायचा प्रयत्न सुरू केला आहे,’ अशी टीकाही पाटील यांनी केली. तसेच, ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जमीन देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ती देताना नियम पाळले पाहिजेत. विधी विभागाची, त्यानंतर अर्थ विभागाची मान्यता असणे आवश्यक आहे. त्यानंतर ती फाइल कॅबिनेटमध्ये आणा. एकवेळ कॅबिनेटमध्ये आणायची की नाही तो तुमचा निर्णय आहे. मात्र, अर्थ विभागाला तरी पटवून द्या,’ अशी भूमिका पाटील यांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times