राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. तर, राज्य सरकारने जनतेसाठी आर्थिक पॅकेजही जाहीर केलं आहे. यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर तातडीने देशात लॉकडाऊन करण्यात येतील आणि देशाचे पंतप्रधानच ते जाहीर करतील, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. तर, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान कमी आणि पक्षाचे प्रचारक जास्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणुका संपल्यावर दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल. मागच्या वेळी मध्यप्रदेशचे सरकार पाडल्यानंतर अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन केलं. तितपर्यंत करोना देशात येऊ दिला. करोनाच्या परिस्थीतीत देशाचे पंतप्रधान प्रचारासभेत मग्न असतील हे देशवासीयांचे दुर्दैव आहे, असंही ते म्हणाले आहेत.
करोना ही राष्ट्रीय महामारी आहे व ती देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केली आहे. देशातल्या सगळ्या राज्यात १ ते १० एप्रिलपर्यंत करोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. तर, एकीकडे पंतप्रधान मास्क घाला म्हणून सांगतात तर दुसरीकडे पंतप्रधान स्वतः प्रचारात मस्त आहेत तर लोकं करोनामध्ये त्रस्त आहेत. घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times