ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १७वे षटका हे फार महत्वाचे असते. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने हे षटक युवा शाहबाझ अहमदला दिले आणि सामना त्याने फिरवला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाझने जॉनी बेअरस्टोला बाद केले आणि हैदराबादला तिसरा धक्का दिला. बेअरस्टोला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाहबाझने स्थिरस्थावर झालेल्या मनीष पांडेला बाद केले आणि आरसीबीला मोठे यश मिळवून दिले. कारण खेळपट्टीवर मनीष हा एकच स्थिरस्थावर झालेला फलंदाज होता आणि तो सामना फिरवू शकत होता. मनीषला यावेळी ३८ धावांवर समाधान मानावे लागले.
सलग दोन चेंडूंवर शाहबाझने विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या चेंडूवर शाहबाझ हॅट्रिक साधणार का, याची उत्सुकता चाहत्यांना होती. त्यावेळी विजय शंकर हा फलंदाजी करत होता. शाहबाझचा तिसरा चेंडू शंकरने बचावात्मकपणे खेळला आणि शाहबाझची हॅट्रिक हुकली. चौथ्या चेंडूवर शंकरने एक धाव काढली. ही या षटकातील एकमेव धाव ठरली. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शाहबाझने धडाकेबाज फलंदाज अब्दुल समदला बाद केले. समदला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे शाहबाझने १७व्या षटकात तीन विकेट्स घेत सामना आरसीबीच्या बाजूने झुकवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शाहबाझ यावेळी आरसीबीसाठी मॅचविनर ठरल्याचे पाहायला मिळाले.
आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची चांगलीच जोडी जमली. वॉर्नर आणि पांडे या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची दमदार भागीदारी रचली. वॉर्नरने यावेळी अर्धशतकही साजरे केले. पण वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादच्या हातून विजय निसटल्याचे पाहायला मिळाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times