राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही जिल्ह्यांत एका दिवशी हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. कठोर निर्बंध लावले आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोलापूर शहर पोलीसही कारवाईसाठी सज्ज झाले असून, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
संचारबंदी असल्याने आज सोलापूर शहर पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. या दरम्यान शहरातील सात रस्ता चौक आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर अनावश्यक फिरणारे दुचाकीस्वार दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्व दुचाकीस्वारांना थेट पोलीस ठाण्यात नेले. जवळपास ३० जणांकडून दंड वसूल करण्यात आला असून, त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times