दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे कल पाहता आम आदमी पक्षानं दिल्ली पुन्हा राखल्याचं चित्र आहे. सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा दावा निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आम आदमी पक्ष ५७ जागी तर, भाजप अवघ्या १३ जागी आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांनी निकालाबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना भाजपवर तोफ डागलीय. ‘दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे. लोकांना सरकारकडून आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षणासारख्या मूलभूत विषयांवर काम व्हावं अशी मुख्य अपेक्षा असते. ते देणाऱ्या व देण्याचं आश्वासन देणाऱ्या पक्षालाच दिल्लीकरांनी विजयी केलं आहे, असं रोहित म्हणाले. ‘भाजपनं दिल्लीसाठी पूर्ण जोर लावला होता. त्यांचे १२ मुख्यमंत्री, महाराष्ट्रासह विविध राज्यांतील माजी मंत्री, ६०० पेक्षा जास्त पदाधिकारी दिल्लीत तळ ठोकून होत्या. खुदद् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतल्या. अनेकांच्या म्हणण्यानुसार पैशाचाही बराच वापर झाला. मात्र, लोकांनी हे सगळं नाकारलं. लोकांनी योग्य तोच निर्णय घेतला,’ असं रोहित म्हणाले.
‘दिल्लीनंतर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या मोठ्या राज्याच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तिथं भाजप कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. मात्र, त्या राज्यांत प्रादेशिक पक्षांनी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होईल,’ असंही ते म्हणाले.
शरद पवारांकडूनही अभिनंदन
दिल्लीतील विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल व त्यांच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times