‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वकांक्षी लोकाभिमुख शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली. बचत गटांना प्रत्यक्ष रोजगार मिळणारी ही योजना आहे. तसेच कष्टकरी व मजूर यांना या योजनेचा फायदा होत होता. मात्र, ही शिवभोजन योजना येथील महिला बचत गटांना देणं आवश्यक होते पण तहसीलदार व आरोग्य विभाग कँटिंनमध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु आहे’, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केला आहे. तसंच, हॉटेल व्यावसायिकांनी ही शिवभोजन थाळी सुरू केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘सध्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन काळात मोफत शिवभोजन योजनेची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे. जिल्ह्यात बारा केंद्रे सुरू असताना वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन केंद्र हे केवळ चार महिने सुरु होते. मागील लॉकडाऊन काळातच ते बंद पडले आहे. त्यामुळे सध्या शिवभोजन योजना केवळ दिखाऊ ठरत आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘योजनेतील शिवभोजन लाभार्थींची दर दिवसाची आकडेवारी यादी ही फसवी असल्याने या योजनेची पोल-खोल करणार असून विरोधी पक्ष नेते याचे लक्ष वेधणार असल्याची, माहिती देसाई यांनी दिली आहे. तर, दुसऱ्या लॉकडाउनच्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या अकरा केंद्रामध्ये पहिल्या दिवशी ४६९ तर दुसऱ्या दिवशी ४६४ लाभार्थींनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. सध्या जिल्ह्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात दिली जात आहे. त्यामुळे १२ पैकी अकरा केंद्रावरील कल्पक आकडेवारी अधिकारी देत असल्याचा आरोप त्यांनी दिला आहे. तसंच, सदर योजना जिल्ह्यात फक्त कागदोपत्री चालू असल्याचा दावा केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times