मुंबई : भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आज केकेआरवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता. आजच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

केकेआरच्या १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग रताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. पण यावेळी राजस्थानला मोठी सलामी मिळू शकली नाही. कारण केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने जोस बटलरला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. बटलर आऊट झाल्यावरही यशस्वी जैस्वाल हा धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात यशस्वीही बाद झाला. यशस्वीने यावेळी २२ धावा केल्या.

यशस्वी बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांची चांगली जोडी जमली. संजू यावेळी दमदार फलंदाजी करत होता आणि शिवम त्याला चांगली साथ देत होता. पण यावेळी गरज नसताना शिवम फटकेबाजी करायला गेला आणि ही जोडी मोडली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावा केल्या. दुबेने यावेळी १८ चेंडूंत २२ धावा केल्या. दुबे आऊट झाल्यावर राहुल तेवातिया फलंदाजीसाठी आला. पण यावेळी संजूसारखा स्थिरस्थावर झालेला फलंदाज समोर असताना तेवातिया आक्रमण करण्यासाठी गेला आणि बाद झाला. राहुलला यावेळी पाच धावांवर समाधान मानावे लागले.

यावेळी केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. कारण केकेआरचा युवा सलामीवीर शुभमन गिल ११ धावांवर बाद झाला आणि त्यांना पहिला धक्का बसला. त्यावेळी केकेआरची अवस्था १ बाद २४ अशी होती. आतापर्यंत नितीष राणा हा चांगल्या फॉर्मात होता. पण आजच्या सामन्यात राणाला २२ धावांवर समाधान मानावे लागले. राणा बाद झाला असला तरी एकाबाजूने राहुल त्रिपाठी हा धावा जमवत होता. पण राहुलला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. राणा बाद झाल्यावर सुनिल नरिन हा फलंदाजीसाठी आला. नरिन मोठे फटकेबाजी करेल, असे वाटत होते. पण नरिनला यावेळी सहा धावांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गन हा फलंदाजीसाठी आला. पण मॉर्गनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. मॉर्गन बाद झाल्यावर काही वेळातच केकेआरचा स्थिरस्थावर झालेला फलंदाज राहुलही बाद झाला आणि संघाला मोठा धक्का बसला. राहुलने यावेळी २६ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल हे फलंदाजी करत होते. रसेलला यावेळी फक्त ९ धावांवरच समाधान मानावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here