ठाणेः वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात चार करोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णालयानं हे आरोप फेटाळले आहेत.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आक्रोश केल्यानंतर मनसे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांच्या नातेवाईक संतप्त झाले होते. रुग्णालय परिसरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here