एवढचं नाही तर ४ ते ८ मे दरम्यान करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या रोज ४.४ लाखापर्यंत जाऊ शकते, असंही संशोधकांनी म्हटलं आहे. भारतात सोमवारी करोनाचे ३.५२ लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले. तर २८१२ जणांचा करोनाने मृत्यू झाला. यासह देशातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही २८, १३, ६५८ इतकी झाली आहे.
आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या संशोधकांनी सूत्र नावाच्या मॉडेलचा उपयोग केला आहे. या मॉडेलच्या आधारावर त्यांनी मे महिन्याच्या मध्यापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही देशात १० लाखांवर जाऊ शकते, असं म्हटलं आहे. नव्या अंदाजात कालावधी आणि रुग्णसंख्येत सुधारणा करण्यात आली आहे. देशात ११ ते १५ मेदरम्यान करोनाची दुसरी लाट टीपेला पोहोचेल आणि उपचार घेणाऱ्यांची संख्या ही ३३ ते ३५ लाखांपर्यत जाऊ शकते. तसंच मे अखेरीस रुग्णसंखेतील ही तेजी कमी होईल, असा अंदाज त्यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता.
आयआयटी कानपूरमधील कंम्प्युटर विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी रविवारी ट्वीटरवर आकडेवारी शेअर केली होती. आपण व्यक्त केलेल्या अंदाजात किमान आणि कमाल अशी गणनाही केली आहे. वास्तविक आकडा हा किमान आणि कमाल आकड्यांच्या मध्ये असेल, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे. अंतिम आकडा काय असेल हे स्पष्ट नाहीए. पण हा संशोधन अहवाल अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही, असं अग्रवाल म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times