विवाहातील नातेवाईकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी पिंप्री देशमुख ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत करोना काळात रजिस्टर मॅरेजबाबत जनजागृती सुरू केली आहे. विवाहसोहळ्यासाठी वधुवरांकडील मंडळींचे मतपरिवर्तन केले जात आहे. पिंप्री देशमुख ग्रामपंचायतीनं चालवलेल्या या प्रयत्नांना यश आलं असून या गावात पहिला विवाह नोंदणी पद्धतीनं पार पडला आहे.
वाचा:
मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. मात्र, जवळच्या नातेवाईकांना कसे टाळायचे? असा पेचही अनेकांसमोर उपस्थित होतो. त्यामुळं इच्छा नसतानाही लग्न सोहळ्यात गर्दी होते. पुढे पोलीस कारवाईलाही सामोरे जावे लागते. शिवाय करोना संक्रमणाची शक्यताही वाढते. त्यावर पिंप्री देशमुख ग्रामपंचायतीनं हा उपाय शोधून काढला.
वाचा:
पिंप्री देशमुख येथील रामदास संपत वसतकर यांनी आपली मुलगी दिपाली हिचा विवाह शेगाव तालुक्यातील बोन्डगाव येथील वामन इलामे यांचा मुलगा राहुल यांच्याशी लावून दिला. ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत गावात हे लग्न झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडून वधुवरांना प्रत्येकी एका वृक्षाचे रोपटे तसेच पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. गावात अशाप्रकारे लग्न लावणाऱ्यांचा अशाच पद्धतीनं सन्मान करण्यात येईल, असं ग्रामपंचायतीनं जाहीर केलं आहे. अशा विवाह सोहळ्यामुळे गर्दी नियंत्रित राहत असल्यानं पोलीस प्रशासनानंही ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times