नाशिक येथील घटनेनंतर ऑक्सीजन पुरवणारी यंत्रणा सुरक्षित रहावी याची काळजी सर्वत्र घेतली जात असताना परभणीत मात्र ही पाईपलाईन उघड्यावर होती. त्यातच रात्री वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे जिल्हा सरकारी दवाखान्यातील निलगिरीच्या एका झाडाची फांदी या उघड्या पाईपवर पडल्यानंतर तो पाईप खाली कोसळला. त्यातून ऑक्सीजनची गळती सुरू झाली. या वेळी तिथे असलेल्या शंकर नाईकनवरे यांनी तातडीने मोबाईलवरुन ही बाब खासदार संजय जाधव यांना कळवली. काही वेळात खासदार जाधव त्या ठिकाणी दाखल झाले.
दरम्यान, त्याचवेळी तिथे असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मोबाईलवरून घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी हे या ठिकाणी तात्काळ दाखल झाले. देशमुख यांनी यावेळी घडलेला प्रकार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही मोबाईल वरून कळवला. त्यांच्याच मोबाईलवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संवाद साधला. घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वाडकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना अशा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा तातडीने दाखल झाला.
गळती थांबविण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे हे घटनास्थळी उशिराने दाखल झाले. जिल्हाधिकारी मुगळीकर हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागरगोजे तिथे आले. विशेष म्हणजे नागरगोजे यांचे शासकीय निवासस्थान त्याच परिसरात आहे. काही नागरिकांनी घटनेची महिती जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांच्या निवासस्थानी जाऊन ही बातमी कळवली होती.
नाशिकच्या दुर्घटनेपासून कोणताही बोध परभणीचा आरोग्य यंत्रणेने घेतला नाही ही बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली. केवळ झाडाची फांदी खाली पडल्यानंतर जर ऑक्सिजनच्या पाईपलाईनची गळती होत असेल तर ही बाब संबंधित यंत्रणेच्या गलथानपणाचा कळस मानली पाहिजे. विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवामान विभागाच्यावतीने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त होत असताना. या ऑक्सिजनच्या पाईपलाईनला कोणतीही सुरक्षितता पुरवली गेली नाही, आपल्याला हा प्रकार कळल्यानंतर आपण तातडीने घटनास्थळी दाखल झालो. घडलेला प्रकार गंभीर आहे. रात्री दोन वाजेपर्यंत पाईपलाईन दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत सुरू झाला अशी माहिती यावेळी खासदार संजय जाधव यांनी दिली. संबंधित कक्षातील १४ रुग्णांना इतरत्र हलविण्याची गरज पडली नाही ऑक्सिजन पुरवठा वेळीच सुरळीत झाला,’ असेही खासदार जाधव म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times