दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. (Deepali Chavan suicide) या घटनेने राज्यासह वन विभागही हादरले होते. दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले चार पानी पत्र सापडले होते. त्यानंतर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नागपुरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मेळघाट प्रकल्पाचे माजी संचालक श्रीनिवास रेड्डी यांनाही निलंबित केले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सुसाइड नोटमधून समोर आले होते. या प्रकरणात आता रेड्डी यांना अमरावती ग्रामीण पोलीस आणि नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. ()
रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. अमरावती पोलीस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत होते. बुधवारी दुपारपासून ते नागपुरात असल्याचे लोकेशनवरून दिसत होते. अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. त्यांनी गुन्हे शाखा तसेच स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डींचा शोध घेतला. रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलजवळ ते दिसून आले. त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईची नागपुरात नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. या संबंधी अमरावती ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पुनम पाटील यांनी रेड्डींना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अमरावती ग्रामीण पोलिसांनी रेड्डी यांना ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी आधीच घेऊन ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times