राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. लॉकडाऊन असतानाही रोजच्या रोज ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. दुसरीकडे, राज्यात लसीचा तुटवडा आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिल्यानंतर देशभरात उद्यापासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुंबईत मात्र आजपासून तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळं १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरेसा पुरवठा करणं हे देखील राज्यापुढं मोठं आव्हान आहे.
वाचा:
अर्थचक्र थांबू नये असा राज्य सरकारचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात १४ एप्रिलपासून लागलेल्या लॉकडाऊनमुळं राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे. त्यातच लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवावा लागल्यामुळं जनतेमध्ये, विशेषत: व्यापारी वर्ग व उद्योजकांमध्ये नाराजी आहे. त्यातच सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फेरीवाले व रिक्षाचालकांपर्यंत पोहोचलंच नसल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला आहे. लग्नसराई असल्यानं ग्रामीण भागांत अनेकांची अडचण झाली आहे. गावागावांमध्ये या निमित्तानं अडवणूक सुरू आहे. या साऱ्यावर मुख्यमंत्री आज काय बोलणार, जनतेला दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या महाराष्ट्र दिन आहे. त्या निमित्तानंही मुख्यमंत्री जनतेला संदेश देण्याची शक्यता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times