करोना महामारीचा सर्वत्र झपाट्याने फैलाव होत आहे. जिल्ह्यासह शहरातसुद्धा दररोज करोना बाधितांचा आकडा आणि मृतांचा वाढता आलेख समाजमन हेलावणारा आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी किंबहुना सोशल डिस्टनसिंगच्या अंमलबजावणीसाठी सर्वात मोठी जबाबदारी पोलिस दलांवर आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवतांना अपुऱ्या साधनसामग्रीनिशी करोनाशी दोनहात करताना यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तरीही यंत्रणा बेसावध
विकेंड लॉकडाऊन, संचारबंदी, कडक लॉकडाऊन पाठोपाठ जिल्हाबंदी आदेशाच्या काटेकोर अंमलबजावणी साठी यंत्रणेला २४ तास रस्त्यावर उतरावे लागत आहे. सध्या शहरात अँटिजन टेस्टचा धडका सुरु आहे. टेस्टमध्ये बाधित रुग्णांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची खबरदारीही तेवढीच महत्त्वाची आहे.
गतवर्षीचा कटु अनुभव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या अकोला पोलिस दलातील सर्वच जिगरबाज पोलिसांसह अन्य घटकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करणे हे सध्या काळाची गरज बनली आहे.
केवळ हातात काठी अन् तोंडावर मास्क
पोलिसांचा नाकाबंदी, गस्त, संचारबंदीसह तपासणीवेळी पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. पीपीई किट, फेसशिल्ड, हँन्डग्लोव्हज, सॅनिटायझर, प्रमाणित मास्क अत्यावश्यक असताना हातात काठी, तोंडावर मास्क अश्या स्थितीत जागोजागी अधिकारी, पोलिस दिसुन येत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times