राज्यात आजपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालं आहे. या वयोगटातील नागरिकांची संख्या ६ कोटींच्या आसपास असल्यानं लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यातून संसर्गाची वाढण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातील येथे लसीकरणाचा अनोखा पॅटर्न राबवला जात आहे. त्यामुळं येथील लसीकरण केंद्रांवर गर्दी तर सोडाच, रांगाही बंद झाल्या आहेत.
वाचा:
लसीकरणासाठी होऊ शकणारी गर्दी टाळण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात टोकन पद्धती सुरू करण्यात आली आहे. ही पद्धत अगदी साधीसोपी आहे. त्यानुसार, लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींनी केंद्राबाहेर ठेवलेल्या एका डब्यात चिठ्ठी टाकायची आणि शांतपणे घरी जायचे. त्यानंतर फोन आला की लसीकरणासाठी यायचे, अशी ही पद्धत आहे. या अभिनव प्रयोगामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरली असून आतापर्यंत ४५ वर्षावरील सुमारे १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लस टोचून घेतली आहे. आजपासून सुरू होत असलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा पॅटर्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
वाचा:
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या संकल्पनेतून ही पद्धत सुरू करण्यात आली आहे. पहिला डोस व दुसरा डोस असे दोन प्रकारचे डबे रुग्णालयाच्या परिसरात ठेवण्यात आले आहेत. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना या डब्यात नाव, वय, मोबाइल नंबर, कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन असा उल्लेख केलेले कूपन टाकण्यास सांगून घरी पाठवले जात आहे. त्यानंतर त्यांना फोन करून बोलावण्यात येत आहे.
वाचा:
एका दिवसाला सुमारे ५०० ते ६०० नागरिक या डब्यांमध्ये टोकन टाकतात. त्यांची रितसर नोंद करून लसीच्या उपलब्धतेनुसार फोन करून संबंधितांना लसीकरणासाठी बोलावलं जात आहे. त्यामुळं उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी कमी झाली असून, नागरिकांनाही लस घेणं सोपं झालं आहे. लसीकरणाचा हा पॅटर्न अत्यंत यशस्वी ठरला असून राज्यभरातील लसीकरण केंद्राना दिशा देणारा आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times