तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. तृणमुल काँग्रेसच्या विजयानंतर भाजपनंही पराभव स्विकारला आहे. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचे अभिनंदन. केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहिल. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करु,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
‘पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजपा जनतेची सेवा करत राहिल. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो,’ असं म्हणत पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचा विजय झाला असला तरी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे नेते व एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी यांनी ममता दीदींचा पराभव केला आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे. नंदीग्रामचा निर्णय स्वीकारते. पण या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर फेरफार करण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times