उल्लेखनीय म्हणजे, नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक इतकी चुरशीची ठरली की मतमोजणीच्या १५ व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारींहून २७०० मतांनी पुढे होत्या. मात्र मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेरीस तृणमूल उमेदवार ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात केवळ ६ मतांचा फरक उरला होता. अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झालाय.
निकालाचा गोंधळ
वृत्तसंस्था ‘एएनआ’नं ४.३० वाजता ममता बॅनर्जी यांच्या विजयाची बातमी दिली. परंतु, भाजपनं मात्र नंदीग्रामध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचा दावा केल्यानं काही वेळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १६२२ मतांनी पराभूत केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून अद्यापही मतमोजणी सुरु असल्याचं सायंकाळी ६.३५ च्या सुमारास सांगण्यात आलं.
याच दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका जाहीर पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी जनतेचे आभार मानलेत. या पत्रकार परिषदेत ‘नंदीग्रामच्या जनतेचा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल’ अशी प्रतिक्रिया ममतांनी नंदीग्रामच्या निकालाच्या गोंधळावर दिलीय.
नंदीग्रामचा निर्णय स्वीकारते. पण मी या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे, असंही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.
पश्चिम बंगालचा अंतिम निकाल अद्याप हाती आलेला नसला तरी ‘आम्ही २२१ जागांवर विजय मिळवला आहे. भाजप पराभूत झालीय. केंद्राच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतरही तृणमूलनं ‘लँडस्लाईड’ विजय मिळवला आहे. मी म्हटलं होतं की आम्ही डबल सेन्चुरी ठोकू. या विजयानं पश्चिम बंगालच्या जनतेला वाचवलंय. ‘खेलो होबे’ झाला आणि शेवटी आमचाच विजय झाला’, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times