बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला आता क्वारंटाइन व्हायला सांगितले आहे. कारण कोलकाता नाइट रायडर्सचा अखेरचा सामना हा दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळवला गेला होता. त्याचबरोबर गेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीही खेळला होता, ज्याला आज करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिल्लीच्या संपूर्ण संघाला आता क्वारंटाइन व्हावे लागेल, असा आदेश बीसीसीआयने दिला आहे. दिल्लीच्या संघाचा क्वारंटाइनचा कालावधी नेमका किती दिवसांचा असेल, हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ पुढचा सामना खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझ या वृत्तसंस्थेला सांगितले की, ” आमचा सामना हा केकेआरबरोबर खेळवण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सध्याच्या घडीला क्वारंटाइन झालो आहोत आणि प्रत्येक जण आपल्या रुममध्येच आहेत. सध्याच्या घडीला हा क्वारंटाइनचा कालावधी किती दिवसांचा असेल, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. त्याचबरोबर आमच्या संघाचा सराव कधी सुरु होणार, याबाबतही आम्हाला कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.”
दिल्ली कॅपिटल्स आणि केलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना २९ एप्रिलला खेळवण्यात आला होता. या सामन्यात केकेआरच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना १७ षटकांमध्येच जिंकला होता. त्याच़बरोबर दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यावेळी सामनावीरही ठरला होता. पृथ्वीने या सामन्यातील पहिल्याच षटकात सहा चौकार लगावत अनोखा विक्रमही केला होता. त्याचबरोबर या सामन्यात वरुण चक्रवर्तीही खेळला होता आणि त्याने चार षटके गोलंदाजी केली होती.
(क्रिकबझ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रथम प्रकाशित केले आहे.)
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times