‘सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केलं. त्यामुळं कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तसंच, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे,’ असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.
‘मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, करोनाची महामारी आहे कोणीही उद्रेक करु नका. आपली लोकं जगली पाहिजेत. करोनामुळं संयम ठेवा,’ असं आवाहन संभाजीराजेंनी समाजाला उद्देशून केलं आहे.
‘आधीच्या सरकारनेही जोमानं बाजू मांडली होती. या सरकारनंही चांगली बाजू मांडली होती. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाहीय, असंही ते म्हणाले. बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं गेलं, महाराष्ट्राला दिलं गेलं नाही ही समाजाच्यावतीने दुर्दैवी बाब आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.
‘समाजानं जगाला दाखवून दिलं आरक्षणाची किती गरज आहे. शांतताप्रिय मोर्चे काढले. जगाला आम्ही दाखवून दिलं होतं मोर्चे कसे असतात,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times