पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे नरसंहार सुरू आहे आणि निर्घृण हत्या होत आहेत, यावरून ३६ तास मौन बाळगून या रक्तपातात आपणही सामील असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं आहे. ममतांचं मौन हे सर्व काही बोलत आहे आणि याच रक्ताने माखलेल्या हातांनी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत, असं जे. पी. नड्डा म्हणाले.
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार आणि हत्यांचा तीव्र निषेध आहे. आम्ही बंगालच्या जनतेच्या पाठिशी उभे आहोत. ज्या ठिकाणी या हिंसक घटना आणि हत्या घडल्या आहेत तेथील नागरिकांसोबत आहोत. पश्चिम बंगालमधील या रक्तपाताने भारत-पाकिस्तान फाळणीची आठवण करून दिली, असं हल्लाबोल नड्डांनी केला.
फाळणीचा तो दिवस आज आपल्याला आठवतोय. कारण तशीच स्थिती २ मे रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. २ मे चा दिवसा ‘खेला होबे’चा असेल, असं ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणाल्या होत्या. आता तेच घडतंय, असं नड्डा म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये कशा प्रकारे नरसंहार सुरू आहे, हे फोटोंमधून समोर आले आहे. ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या नेत्यांना सामान्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीए. त्यांनी बंगालला रक्तरंजित केले आहे. सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यांनी बंगाल रक्तरंजित केला आहे. पण बंगालमधील राजकीय हिंसाचार संपवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असं जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजप पश्चिम बंगालमध्ये आपलं कर्तव्य पार पाडेल, असं नड्डा म्हणाले.
ममतांनी आरोप फेटाळले
हिंसाचार खपवून घेणार नाही. पण ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, तिथे भाजपचा विजय झाला आहे. भाजप जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. सर्व राजकीय पक्षांनी आशा राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times