‘मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये समन्वयाचा अभाव नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी लढाईचा जो मार्ग दाखवला होता, त्याच मार्गाने या सरकारने लढा सुरू ठेवला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण न करता एकत्र येवून मराठा समाजासाठी काय मार्ग काढता येईल, यासाठी मदत करावी,’ असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
‘विरोधी पक्षनेत्यांनी आमच्यासोबत यावं’
‘मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोर्ट आता असं म्हणत आहे की या आरक्षणावर कायदा करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही, तर तो केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे आम्ही सगळे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जाऊ. विरोधी पक्षनेत्यांनी आमच्यासोबत यावं,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
करोना स्थितीवरून पलटवार
मुंबई आणि महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होऊ लागल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
‘देशातील करोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र मॉडेलचाच वापर करावा लागेल. या मॉडेलचा वापर केला नाही तर देशातील करोना प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन करोनाला रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही मुंबईतील मॉडेलचा वापर इतर शहरांना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही महाराष्ट्रातील स्थितीवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षाला मोठी चपराक आहे,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times