घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतरही घरातच राहणे धोक्याचे असूनही अनेक जण घरात राहत असल्याने गुदमरून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घरात पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी व्यवस्थित नियोजन करावे. पेस्ट कंट्रोलनंतर किमान आठ तास घराबाहेर राहून घरातील फरशी पुसून घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र, अनेकदा या सल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.
घरात ढेकणे, झुरळ झाल्याच्या घटनेने अनेकदा पेस्ट कंट्रोल करण्याकडे नागरिकांचा ओढा असतो. त्या वेळी पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांकडून औषध फवारणी करण्यात येते. मात्र, ही औषध फवारणी करणाऱ्यांकडून अनेकदा काळजी काय घ्यायची किंवा कशी घ्यायची याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः आजार असलेल्या व्यक्तींना आतापर्यंत त्याचे फटके बसले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर गुदमरून दोन ते तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नुकतीच ही घटना घडली. सिंहगड, कोथरूड आणि बिबवेवाडी येथे या तीन घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पेस्ट कंट्रोल करून घेण्याबाबतच्या काळजीचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत फिजिशियन, बालरोगतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
‘पेस्ट कंट्रोलमुळे लहानमुलांसह वृद्धांचा जीव गुमदरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात पेस्ट कंट्रोल केल्यावर लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे. त्यांना श्वसनविकाराचे आजार होण्याची शक्यता असते. अस्थमा, अॅलर्जी, सर्दी, खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. लहानमुलांना उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते,’ असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. ‘पेस्ट कंट्रोलमध्ये जास्त तीव्रतेचे रासायनिक पदार्थ वापरले गेल्यास आणि अशा वेळी घरातच थांबल्यास श्वासोच्छवास घेणे अवघड असते. हृदयाचे ठोके कमी-जास्त होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला.
काय काळजी घ्याल?
– पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरातील खोल्या बंद कराव्यात.
– काही तासानंतर खोल्यांचे दरवाजे, खिडक्या उघडाव्यात.
– सर्व खोल्यातील पंखे सुरू करावेत.
– वास गेल्यावरच घरात प्रवेश करावा.
– घरातील भांडी, डबे स्वच्छ धुवून घ्यावीत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times