बुलडाणा : देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी आज पुन्हा जाहीर झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ इथं पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. यंदा मात्र, लॉकडाऊनमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी (bhendwal ghat mandni)करून त्यातून झालेल्या हालचालीवरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे.

यानुसार यंदा पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. गेल्या ३५० वर्षांपासून भेंडवळ इथं भविष्यवाणी वर्तवण्यात येते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तवले.

यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल तर शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे.

‘जून महिन्यात पाऊस साधारण’
पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहिल असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी उपस्थितीत माध्यमांवर जाहीर करण्यात येईल, अशा घोषणेनंतर आज सारंगधर महाराज यांनी ही घोषणा केलीय. मात्र संपूर्ण देश करोनाचे संकट झेलत असताना हे महामारी संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं चिंता आणखी वाढली आहे.

भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणती भाकितं ?

राजा कायम – राजा कायम आहे. मात्र, आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.

पाऊस – जून महिन्यात पाऊस कमी असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल. अवकाळी पाऊसाचा प्रभाव या वेळेस कमी असणार आहे मात्र जनतेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असले.
पीक – ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.

नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते. रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थितीसुद्धा कमकुवत होईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here