पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी फळ उत्पादन घेतात. येथील श्रीकृष्ण देशट्टीवार यांच्याकडे ४ एकर केळी, ५ एकर टरबूज आणि ३ एकरवर लिंबू लागवड केली. मात्र, आता व्यापारी शेतात तोडणीसाठी आणि निर्यातीसाठी तयार असलेला माल नेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
राज्यातील कडक निर्बध आणि बाजूच्या राज्यातील लॉकडाऊन यांचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे आता पीक कुणी घेण्यास तयार नसल्याने देशट्टीवार यांनी शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले आहे.
व्यापारी केळी विकत घेत नाही. त्यामुळे केळी पिवळी पडली आहेत तर कुठं गळून पडली आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांना पेटवून दिले आहे. हीच अवस्था केळी आणि टरबूज प्रमाणे ३ एकर वरील लिंबुची झाली आहे. हजारो रुपये शेतकऱ्यांनी शेतात खर्च केले आहेत आता व्यापारी उत्पादित माल नेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
खैरगाव पांढरकवडा याच भागातील महेंद्र नैताम यांनी सुद्धा ३ एकरवर टरबूजची लागवड केली. मात्र त्यांचाही माल नेण्यास व्यापारी तयार नाही. श्रीनिवास शिवणवार यांच्याकडे सुध्दा ४ एकर टरबूज लागवड केली आहे. मात्र, तो माल नेण्यास कुणी व्यापारी तयार नाही त्यामुळे टरबूज शेतात सडून जात आहेत, अशी प्रतिक्रिया श्रीकृष्ण देशट्टीवार यांनी केली आहे.
याच भागातील साधारण ४० एकर क्षेत्रावर यांनी टरबूज लागवड केली त्या सर्वांची अशीच विदरक अवस्था झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कडक निर्बध आणि शेजारील राज्यातील लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे, असं शेतकरी श्रीनिवास शिवणकर यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times