तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचा रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार असून, वादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासनातर्फे या पट्ट्यात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केल्यामुळं जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आज व उद्या घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे.
पुणे, कोल्हापूरला फटका
कोकण किनारपट्टीला आज झालेल्या मुसळधार पावसानं झोडपून काढले आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांतही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यात वादळी वारा व पावसामुळं झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव परिसराला पावसाने दिवसभर अनेकदा झोडपून काढले. शिवाय जोरदार वारा आणि थंडी यामुळे या भागातील वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. एकीकडे जोरदार वारा आणि दुसरीकडे थंडीमुळे थंडीने हा परिसर गारठून गेला .
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times