तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मुंबई, ठाणे व पालघर परिसराला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच मुंबई व परिसरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळं मुंबईकरांची झोप उडवली आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर, काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचं चित्र आहे.
वादळी वारे आणि पावसामुळं खबरदारी म्हणून वरळी सी- लिंक पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसंच, खराब हवामानामुळं मुंबई विमानतळ ११ ते दुपारी २ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई- मुंबई विमान सुरतला वळवण्यात आले आहे. मुंबईतील मोनोरेलही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई शहरात ५ ठिकाणी व पूर्व उपनगरात १ अशा एकूण ६ ठिकाणी भिंत पडण्याच्या तक्रार समोर आल्या आहेत. तर, पेडर रोड, हिंदमाता, महालक्ष्मी जंक्शन व सांताक्रुझ येथील मिलन सबवे येथे पाणी साचल्यामुळं वाहतूकीचा अडथळा निर्माण झाला आहे. अंधेरी सबवेही वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यामुळं घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळं काही काळ लोकल विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवले आहे. त्यानंतर मुंबई लोकलची वाहतूक सुरळीत सुरु आहे.
बीकेसी कोव्हिड सेंटरचे नुकसान
मुंबईत सुरु झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील कोव्हिड सेंटरला फटका बसला आहे. कोव्हिड सेंटरचे पत्रे उडून गेले आहेत तर सेंटरची मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबई किनारपट्टीपासून १२० किमी अंतरावर आहे. हे वादळ वेगानं पुढे सरकत असून राजस्थान व गुजरातला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील १२ हजार ४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times