वाचा:
मुंबईला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. मुंबईजवळ समुद्रात वादळ धडकल्यानंतर त्याचा प्रभाव शहरात जाणवू लागला. मुंबईच्या समुद्रानेही रौद्र रूप धारण केले. कुलाबा भागात तर वाऱ्याचा वेग ताशी ११४ किलोमीटर पर्यंत पोहचला होता. , मरिन ड्राइव्ह या ठिकाणी समुद्राचे आक्राळविक्राळ रूप पाहायला मिळाले. या स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा आधीपासूनच सज्ज होती. या सज्जतेमुळे संकट मोठं असूनही त्याचा समर्थपणे प्रतिकार करता आला. एकीकडे मुंबई पालिका आयुक्त नियंत्रण कक्षातून स्थितीवर लक्ष ठेवून होते तर महापौर किशोरी पेडणेकर थेट फील्डवर उतरल्या होत्या. पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी- फेस, दादर या चौपाट्यांची पाहणी करून मुंबई महापालिकेने समुद्र किनाऱ्यांवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
वाचा:
महापौर पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली असून मनुष्यहानी मात्र कुठेही झाली नाही. वृक्ष कोसळण्याच्या घटनांबाबत संबंधित त्या-त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना भ्रमणध्वनीद्वारे अवगत केले असल्याचे महापौर म्हणाल्या. अग्निशमन दलातर्फे तातडीने वृक्ष हटविण्याचे काम सुरू आहे. तसेच काही किरकोळ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम ठीकठिकाणी तैनात करण्यात आल्या असून पोलीस गस्त घालून वाहतूक सुरळीत करीत आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या पातमुखांवर महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर महानगरपालिका प्रशासन लक्ष ठेवून असून तातडीच्या योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. जोरदार वादळी वारे असल्यामुळे नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times