करोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ( ) तुम्हाला करोनाचा संसर्ग झाला असेल तर त्यानंतर लसीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांनी घ्यावा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल करत या सूचना केल्या आहेत.
NEGVAC म्हणजेच द नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेन फॉर कोविड-१९ कडून यासंदर्भात शिफारस करण्यात आली होती. करोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी. त्या आधी लस घेणं टाळलं जावं, असं NEGVAC ने दिलेल्या नव्या शिफारसींमध्ये म्हटलं होतं. ही शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.
लसीकरणाच्या पातळीवर केंद्र सरकारने स्तनदा माता आणि गर्भवती महिलांसाठीही स्पष्टता आणली आहे. स्तनदा माताही लस घेऊ शकतात. मात्र गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तसंच ज्या रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्यास त्याच्या ३ महिन्यांनी ते करोनावरील लस घेऊ शकतात, असं सरकारने म्हटलं आहे.
करोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कुणाला करोनाचा संसर्ग होत असेल तर त्याने करोनामुक्त झाल्याच्या ३ महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा. कुणाला दुसरा गंभीर आजार असेल आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल झाला असेल त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी ४ ते ८ आठवड्यांनंतर करोनावरील लस घ्यावी. करोनावरील लस घेतल्या १४ दिवसांनंतर रक्तदान करता येणार आहे. एखादा करोना बाधित असेल आणि उपचारानंतर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आढळून आल्यास ती व्यक्ती रक्तदान करू शकते. लसीचा डोस घेण्यापूर्वी रॅपिड अँटीजन चाचणी गरजेची नाहीए, असं सरकारने नव्या नियमावलीत म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times