तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सर्वाधिक नुकसान कोकणचे झाले आहे. कोकणात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर, बागायती शेतींचे नुकसान झालं आहे. घरांचीही पडझड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
‘ गुजरातला धडकलं तिथं ४५ जणांचा मृत्यू झालाय. गावं मोठ्याप्रमाणात उद्ध्वस्त झाली. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहणी करुन त्या ठिकाणी मदतीची घोषणा केली. त्या मदतीच्या प्रेस नोटमध्ये उल्लेख आहे की, अन्य राज्यांनादेखील यामध्ये मदत होणार आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘चक्रीवादळामुळं आठ राज्यांना फटका बसला आहे. त्यात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेश या राज्यांत नुकसान झालं आहे. केंद्र सरकार या सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यात केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपची राज्य नाही किंवा आपण दुसरा विचार केला, तर गोवा व कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत. तरीदेखील काल घोषणा गुजरातचीच झाली. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे,’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
‘एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे अगाऊ देतं. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशाप्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले. ते केंद्र सरकार परत करत असतं किंवा नव्याने देत असतं, केंद्र सरकारचेच ते पैसे असतात. हे सगळं राज्याला माहिती आहे, असं असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. राज्याला निश्चितपणे मदत केंद्र सरकार करेल,’ असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times