शिवाजी कैलास आढाव राहणार काकनवाडा तालुका संग्रामपुर असं आत्मसमर्पण करणाऱ्या पतीचं नाव असून त्याचा ४ वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील कावसा येथील संजीवनी आढाव हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता. मात्र, प्रेमाचा रंग फार दिवस टिकून राहिला नाही. काही दिवसातच दोघांमध्ये भांडण-तंटे व्हायला लागले आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
यानंतर पोलिसांनी वाद सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि पती-पत्नी हे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात भाड्याने राहायला आले. मात्र संजीवनी आढाव हिला पतीसह सासरकडील मंडळीचाही खूप त्रास होता. तसंच पती शिवाजी आढाव हा तिला मारहाण करत असे, असा आरोप मृतक संजीवनीच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि वादात शिवाजी आढाव याने पत्नी संजीवनीला उशीच्या साहाय्याने तोंड दाबून ठार केले. यानंतर बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवाजी आढाव हा शेगाव शहर पोलिसात दाखल झाला आणि आपण आपल्या पत्नीला ठार केल्याचे सांगून त्याने आत्मसमर्पण केले.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आठवड्याभरात लागोपाठ दोन खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आठवड्याभरापूर्वी बापाने आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली होती, त्यानंतर आता हे हत्या प्रकरण समोर आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times