: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता आणखी एका गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी म्युकरमायकोसिसचे अधिकृतपणे ६६ रुग्ण होते. मात्र, जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे एकूण २०० च्या वर रुग्ण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात आता काळ्या बुरशीमुळे होणारा आजारही चांगलाच हातपाय पसरायला लागला आहे. म्युकरमायकोसीसमुळे दात, डोळे, कान, तोंड, नाक असे अवयव मोठ्या प्रमाणात संसर्गित होत आहेत. लक्षणे दिसताच तत्काळ दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे ६६ रुग्ण उपचार घेत होते. यापैकी शहरातील एका महिला रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली. हा आकडा आता वाढला असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आठवड्यापूर्वी ६६ रुग्णांवर म्युकरमायकोसीसचा उपचार सुरु होता. मात्र आता ही संख्या २०० वर गेली आहे.

काळ्या बुरशीमुळे होणारा आजार निष्काळजीपणामुळे होऊ शकतो. या आजाराकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचारच परिणामकारक ठरतील. म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड असून, सध्या तेथे २०० च्या वर रुग्ण उपचार घेत आहे. या ठिकाणी काळ्या बुरशीच्या आजारांवरील उपचारासाठी सर्व साहित्य उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे. तसंच काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here