दक्षिण महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात करोनाचा संसर्ग वाढत आहे . तीन जिल्ह्यात रोज साडेतीन ते चार हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होणे कठीण होत आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या तिन्ही जिल्ह्यात सध्या कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकावर पोलिस कारवाई करत आहेत. तरीही काही ना काही कारणे पुढे करत रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे पोलिस आता अधिक कडक झाले आहेत.
केवळ कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभरात सहा हजारावर वाहने जप्त केली आहेत. सत्तर हजारावर वाहनचालकांवर दंडाची कारवाई केली आहे. जवळ सव्वा कोटींचा दंड या वाहनचालकांना करण्यात आला. तरीही कोल्हापुरातील वाहनचालक रस्त्यावर येणे टाळत नसल्याने पोलिसांची ही मोठी डोकेदुखी झाली आहे.
सांगली जिल्ह्यातही या महिन्यात 15000 वाहने जप्त केली. त्यांच्याकडून 32 लाखाचा दंड वसूल केला. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना 35 लाख रुपये दंड केला. सातारा जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या जिल्ह्यात नऊ हजारावर वाहनचालकांवर कारवाई करत 13 लाखाचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये चार हजारावर वाहने जप्त केली आहेत.
या तीन जिल्ह्यात करोनाला रोखण्यासाठी महापालिका, पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे. तरीही अत्यावश्यक कारणे पुढे करत वाहन चालक रस्त्यावर येत असल्याने करोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. वाहने जप्त केल्यानंतरही आणि अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल दिले जात असतानाही वाहनांची रस्त्यावरील वर्दळ कमी होताना दिसत नाही. यामुळे आता पोलिसांनी अधिक धडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या विनाकारण रस्त्यावर येणाऱ्याची दुचाकी जप्त करण्यात येत आहेत. यापुढे चार चाकी वाहने सुद्धा जप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे विनाकरण कुणीही रस्त्यावर येऊ नये.
– तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times