म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथिलता देण्यात आली आहे. १ जून पर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवसापासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. करोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून हॉटेलला पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

किराणा दूध व भाजीपाला सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पार्सल देण्यास परवानगी आहे. लग्न समारंभासाठी केवळ दोन तास वेळेची मर्यादा कायम आहे. तर, २५ जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडण्याचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यात अकरानंतर पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. त्यामुळं ११ नंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आज २ हजार २४० जणांनी करोनावर मात केली आहे. तर, १५७४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ३४ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

होम आयसोलेशन बंद

मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यात करोनाचा धोका असला तरी काही जिल्ह्यांत अजूनही करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळं या जिल्ह्यात करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here