नाशिक : करोनाचा जीवघेणा संसर्ग कमी झाला असून रुग्णसंख्येमध्ये घट झाल्यामुळे नाशिक, कोल्हापूर, धुळ्यामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्यात आले असून अनेक दिवसांनी बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

अधिक माहितीनुसार, अनेक दिवसांनी बाजारपेठा उघडल्याने कोल्हापूरमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. नियमांचे पालन करून बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मोठ्या गर्दीमुळे नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवसापासून कडक लॉकडाऊन सुरू होता. करोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून हॉटेलला पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

किराणा दूध व भाजीपाला सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पार्सल देण्यास परवानगी आहे. लग्न समारंभासाठी केवळ दोन तास वेळेची मर्यादा कायम आहे. तर, २५ जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडण्याचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यात अकरानंतर पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. त्यामुळं ११ नंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.

होम आयसोलेशन बंद
मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यात करोनाचा धोका असला तरी काही जिल्ह्यांत अजूनही करोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळं या जिल्ह्यात करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचाही समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here