सोलापूर: करोना संसर्गावर यशस्वी मात केल्यानंतरही बेफिकीर वागणाऱ्या सोलापूरकरांवर या आजारानं घाला घातला आहे. आतापर्यंत शहर जिल्ह्यात एकूण १८० जणांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली होती. त्यापैकी १२० जणांवर शहरातील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत. तर ५० जण उपचारांनंतर घरी परतले आहेत, मात्र १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

करोनाबाधित रुग्णांवर १५ दिवसांपासून ते दीड महिन्यांपर्यंत उपचार केले जातात. त्यात ऑक्सिजन आणि आयसीयूमध्ये हे उपचार केले जात असतात. याच दरम्यान उपचारासाठी वापरल्या जाणा-या वस्तूंवर धूळ, सुक्ष्मजीव आणि बुरशी वाढते. शिवाय रुग्णालय परिसरात रोगकारक विषाणू वाढतात. करोना उपचरांदरम्यान स्टिरॉइइड आणि अँटीबायोटिक्समुळे रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, याच काळात स्वछता न ठेवल्याने बुरशीजन्य विषाणू नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात. उपचारांमुळे आधीच शुगर वाढलेली असल्याने रुग्णांत बुरशी वाढीला पोषक वातावरण तयार होते.

परिणामी, म्युकरमायकोसीसचा धोका गंभीर रूप धारण करीत आहे. हा आजार बुरशीजन्य असला तरी तो संसर्गजन्य नाही. त्यामुळे रुग्णनिहाय धोक्याचे प्रमाण कमी अधिक आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी म्हणजे शुगर, बीपी किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना ही बाधा होत आहे. तेव्हा करोनाच्या उपचारांनंतरही दोन तीन महिने काळजी घ्यायची गरज असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी सांगितले आहे.

करोना झाल्यानंतर १०० दिवस रुग्णांनी काळजी घ्यावी. त्यात रक्त आणि शुगर टेस्ट करावी. N-95 मास्क एकदाच वापरावा. अन्य मास्क नियमित धुवावेत. अन्यथा म्युकर मायकोसिसचा धोका वाढत असल्याचे महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.अरुंधती हरवाळकर यांनी सांगितले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here