म. टा. विशेष प्रतिनिधी,
करोनासंसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असून रुग्णसंख्येमध्ये उतार येत आहे. मात्र, तरीही लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणताना राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत. राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता चार टप्प्यांत व्यवहार सुरळीत करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. १५ मेनंतरच्या निर्बंधांनाच व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. सकाळी ११ ते ५ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मागणी होत होती. मात्र राज्य सरकारने तसा निर्णय न घेता निर्बंध कायम ठेवले होते. मात्र आता १ जूननंतर निर्बंध शिथिल करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे कळते. निर्बंध उठविताना दुकानदार, व्यापाऱ्यांना प्राधान्य देत पहिल्या टप्प्यात त्यांचे सर्व व्यवहार सुरू करण्यावर सरकारचा भर राहील, असे समजते. १ जूनपासून संचाराबंदी उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरू केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची, याबाबतही परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असे समजते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here