: करोना उपचार केंद्रातून पळून गेलेल्या दोन कैद्यांना जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना १० दिवसांनी यश मिळालं आहे. प्रतिक सरनाईक आणि गुंडाजी नंदीवाले अशी या कैद्यांची नावे असून हे दोन्ही हातकणंगले परिसरात पोलिसांना सापडले.

याबाबत अधिक माहिती अशी की खून, जबरी चोरी, दरोडा अशा विविध प्रकरणात पाचगाव येथील सरनाईक व तमदलगे येथील नंदीवाले या दोघांना कळंबा कारागृह ठेवण्यात आले होते. त्यांना करोनाची बाधा झाल्यामुळे संभाजीनगर येथील आयटीआय वस्तीग्रह इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री खिडकीचे गज कापून १४ मे रोजी या दोघांनी पलायन केले. तेव्हापासून त्यांना शोधण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते.

पोलिसांच्या समोरूनच दोन कैदी पळाल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर होते. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा व सीमा भागात नाकाबंदी करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह चार पथके नेमून या दोघांचा शोध सुरू होता. या दोघांकडे मोबाईल नसल्याने आणि तांत्रिक पुरावा उपलब्ध होत नसल्याने त्यांना पकडणे कठीण जात होते. दोन्ही आरोपी पळून गेल्यानंतर ते गडहिंग्लज, कागल अशा विविध भागात फिरत असल्याची माहिती मिळत होती. ते सतत जागा बदलत असल्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नव्हते.

मंगळवारी सकाळी दोन्ही कैदी हातकणंगले या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केलं. हे दोघेही शेतात लपून बसले होते. पोलिसांनी अतिशय आव्हानात्मक काम फत्ते केल्यामुळे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वीस हजाराचे बक्षीस देऊन पोलिस पथकाचे विशेष कौतुक केले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here