लातूर: जिल्ह्यातील सिरसी या गावी गायरान जमिनीत राहणार्‍या भूमिहीन मजुरांना कसलीही नोटीस न बजावता त्यांच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तसंच या मजुरांना तेथून हुसकून लावण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने केल्याची माहितीही समोर येत आहे.

‘आम्ही सकाळी झोपेत असतानाच अचानक पोलिसांच्या गाड्या, बुलडोजर आले आणि आमच्या झोपड्या जमीनदोस्त करू लागले, आम्ही आरडाओरडा करत विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसानी आमच्या मुलाबाळांसह महिलांना, पुरुषांना मारहाण केली,’ असा आरोप या मजुरांमधील एका महिलेने केला आहे.

या भूमिहीन मजुरांकडून माजी सरपंच सरस्वती जाधव आणि ग्रामसेवक यांनी या गायरान जमिनीचा ताबा देऊ, ही जमीन आपल्या नावे करून देऊ, असं सांगत प्रत्येकी ६ हजार रुपये घेतल्याचा आरोप या भूमिहीन मजुरांनी केला आहे. मात्र या आरोपावर तसेच या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास माजी सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी नकार दिला आहे.

दरम्यान, एक महिला सरपंच असून त्या आमच्याकडे फिरकल्या नाहीत, ग्रामपंचायतला कुलूप लावले आहे. टाळेबंदीमुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटताही येत नाही. आमचं घर उद्धवस्त झालं. आता आम्ही कुणाकडे जायचं? असा सवाल करत या मजुरांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

या भूमिहीन मजुरांनी माजी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्यांच्यावर कारवाई न होता या भूमिहीन मजुरांच्या झोपड्या जमीनदोस्त केल्या गेल्या असून याबाबत परिसरात प्रचंड नाराजी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here