‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत फेब्रुवारी मध्यापासून अचानक वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यास रोखण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाउनच्या निर्बंधांची मात्रा लागू पडली आहे. राज्यात सुरू झालेल्या निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे करोनामुक्तांच्या संख्यावाढीसह प्रतिबंधित क्षेत्रेही घटली आहेत. मुंबईचा विचार करता, काही महिन्यांपूर्वी धडकी भरविलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या गेल्या महिनाभरात झपाट्याने घटली आहे. केवळ एकाच महिन्यात प्रतिबंधित क्षेत्रे सात हजारांपेक्षाही अधिक कमी झाली आहेत. त्यामुळे १५ लाखांहून अधिक मुंबईकर प्रतिबंधित क्षेत्राच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.

मुंबईत फेब्रुवारी मध्यानंतर रुग्णसंख्या १० ते ११ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, सध्या करोनारुग्णांची दैनंदिन संख्या सध्या एक हजारच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी शहरातील रुग्णसंख्या १,०३७ एवढी नोंदविली गेली आहे. त्यामुळे २१ एप्रिल आणि २२ मे मधील करोनास्थितीची तुलना केल्यास एका महिन्यात दीड लाखांवर करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक लाख ५५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७,३०१ने कमी झाली आहे.

दहा लाख चाचण्या

करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून थेट ५० हजारांपर्यंत नेली. यामध्ये वेगाने रुग्ण शोधून प्रभावी उपाययोजना केल्यामुळे दैनंदिन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सुमारे १२०० पर्यंत खाली आले आहे. यामध्ये दररोज ३० ते ४० हजार चाचण्या करण्यात आल्या. २२ एप्रिलपासून २२ मेपर्यंत पालिकेने तब्बल नऊ लाख ९६ हजार ८४८ चाचण्या केल्या आहेत. या कालावधीत मुंबईत एक लाख दोन हजार ४७३ रुग्ण आढळून आले आहेत. तर एक लाख ५४ हजार ९५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ६,५१,२१६ रुग्ण आढळले असून १४,५४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराधीन रुग्ण घटले

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही रोडावत चालली असल्याचे सकारात्मक चित्र आहे. २२ मे रोजी मुंबईत २८,५०८ रुग्ण असून, २१ एप्रिल रोजी

उपचाराधीन रुग्ण संख्या ८३,९३४ होती. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सुमारे १९ हजारांमध्ये करोनाची लक्षणे आढळलेली नाही. तसेच ८,४२७ रुग्णांमध्ये लक्षणे असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्याचवेळी अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या १,२८१ आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांत घट

मुंबईत २१ एप्रिल रोजी प्रतिबंधित क्षेत्र, सीलबंद इमारती-मजल्यांची संख्या १२,९७५ होती. या एकाच महिन्यात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७,३०१ने कमी झाली आहे. संपूर्ण शहरात सध्या ५३ प्रतिबंधित क्षेत्रे, २१७ सीलबंद इमारती आणि ४,७१७ इमारतीचे भाग-मजले सील आहेत. त्याठिकाणी दोन लाख ९३ हजार घरांमधील ११ लाख ७५ हजारांवर रहिवासी आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here