कुटुंबातील सदस्याचे करोनामुळे निधन झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे खुद्द राज ठाकरे यांनी घरी पत्र पाठवून सांत्वन केले. प्रत्येक विभाग अध्यक्षाकडे हे पत्र कार्यकर्त्याच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. माहीम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी त्यांच्या विभागातील पत्रे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दिली. राज ठाकरे यांनी सांत्वनासाठी पाठवलेले हे पत्र वाचून कार्यकर्तेही गहिवरून गेले आहेत.
‘आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करू शकतो. इतक्या वर्षांचे आपले नाते क्षणार्धात अनंतात विलीन झाले. हा धक्का मोठा आहे. या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईसह राज्यात अनेक जण करोनामुळे मृत्युमुखी पडले असून मनसेच्या कार्यकर्त्यांच्या घरीही असे प्रसंग घडले आहेत. अशा सर्वांच्या नावाची यादी राज ठाकरे यांनी मागविली होती. राज यांना या सर्वांच्या घरी जाणे शक्य नसल्याने त्यांच्या सहीचे पत्र आम्ही घेऊन गेलो आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times