उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यासोबत पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांनी नुकतीच एक बैठक घेतली. ही बैठक यूपीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाल्याची चर्चा आहे. त्यावरूनच शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘मोठा गाजावाजा करूनही भाजपला प. बंगालात विजय मिळवता आला नाही. स्वतः यूपीचे मुख्यमंत्री हे भाजपचे बंगालातील स्टार प्रचारक होते. हिंदुत्वाच्या नावावर तिथं धार्मिक, सामाजिक विभाजन करता आलं नाही. हे ‘टुलकिट’ अपयशी ठरलं. आता उत्तर प्रदेशातही तीच गत होऊ नये, म्हणून सगळेच कामाला लागले आहेत,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
वाचा:
देशातील व उत्तर प्रदेशातील करोनाच्या गंभीर परिस्थितीचे दाखलेही शिवसेनेनं दिले आहेत. ‘उत्तर प्रदेशात करोनाचं संकट भयंकर आहे. तिथल्या परिस्थितीमुळं जगाचे डोळे पाणावले आहेत. गंगेत मृतदेह वाहत येत आहेत. कानपूरपासून पाटण्यापर्यंत गंगाकिनारी प्रेतांचे ढीग लागत आहेत. तिथंच त्यांचं दफन व दहन करावं लागत आहेत. त्याची विदारक छायाचित्रं जगभरच्या मीडियानं छापल्यानं मोदी व सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ही बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी व यूपीच्या निवडणुका जिंकण्यासाठी काय करायचं, यावर चिंतन तसेच मंथन सुरू झालं आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
‘करोनाशी लढाई व लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून पुन्हा एकदा निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. काही शिल्लकच नाही. त्यामुळं फक्त निवडणुका लढवणे आणि जिंकणे एवढेच काम उरले आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक, निवडणुका मागंपुढं झाल्यानं काही आकाश कोसळणार नाही. सध्या संपूर्ण लक्ष करोनाच्या लढाईकडेच देणं गरजेचं आहे. नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल. जगात आपली नाचक्की होईल,’ असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times