राष्ट्रवादीच्या पुढाकाराने राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकविणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या लक्षात आणून दिल्याचं बोललं जात आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी मात्र या अफवा असल्याचं म्हटलं असून मुख्यमंत्री व पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रात चर्चेसाठी अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, लसीकरण, करोना यासारखे अनेक विषय आहेत. लसीकरणासंदर्भातच मुख्यमंत्री व पवार यांच्याच बहुतेक चर्चा झाली. या विषयांवर चर्चा होऊ शकत नाही का?, असा सवाल करतच राऊतांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच, हे सरकार पाच वर्ष टिकणार असून शरद पवारांचा सरकारचा पूर्ण आशीर्वाद आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर पवार पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे ही बैठक झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे जरी समजू शकले नसले तरी विविध मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. करोना आणि म्युकरमायकोसिसचे संकट, लॉकडाउनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरील आक्षेप याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times