मुंबई : करोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे राज्यात हाहाकार माजला आहे. अशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल व्यवसायिक आणि बार मालकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. यावरूनच आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

हॉटेल व्यवसायिक आणि बार मालकांसाठी पत्र लिहणाऱ्या शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी पत्र का नाही लिहलं असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. यावरून त्यांनी एक ट्वीट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहीणार?’ अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

इतकंच नाहीतर महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार असाही सवाल यावेळी त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, या ट्वीटवेळी केशव उपाध्ये यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये ‘पहिलं पत्र बार मालकांसाठी तर दुसरं पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून लिहलं. लॅाकडाऊनमध्ये नुकसान झालं म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात’ अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना लक्ष केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here