वादळाच्या तडाख्यामुळे 439 गावात वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो पूर्ववत केल्याचा दावा केला असला तरी आज वेंगुर्ला, मालवण, देवगड आणि वैभववाडी परिसरातील अतिदुर्गम भागात लाईट गुल आहे. वीज प्रशासनाचे 4 ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे गावांमध्ये अंधार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, HT पोल 97 व LT पोल 566 बाधित आहेत. यासंबंधी पालकमंत्री उदय सामंत यांनी चार दिवसात वीज पुरवठा जिल्ह्यात पूर्ववत होईल असं म्हटलं होतं. पण आता संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा पूर्वीप्रमाणे कधी होणार या प्रतिक्षेत वीज ग्राहक आहेत.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४० घरांचे नुकसान झाले आहे. तसंच २ गोठ्यांचे नुकसान झाले असून ३१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर, ३ शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण २७ घरांचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात मोडून पडला आहे.
सिंधुदुर्गात झालेल्या चक्रीवादळामुळं नुकसानीचे पंचनामे उद्यापासून हाती घेण्यात येणार असून या आठवड्यापर्यंत नुकसाग्रस्तांना भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालक मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असून नुकसानभरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. तर, वेंगुर्लेतील ५८ कुटुंबे, देवगड २५ आणि मालवण मधील ३५ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती, उदय सामंत यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times