तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, शेतींनाही वादळाचा फटका बसला आहे. तर, अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा पाहणी दौरा सध्या सिंधुदुर्ग भागात सुरु आहे. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनीही शुक्रवारी दुपारी देवबाग येथील वादळग्रस्त भागांची पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘वैभव नाईक यांना दोन शब्द विधानसभेत बोलता येत नाही कणकवलीच्या बाजारात पाठवण्याऐवजी जनतेने त्यांना विधानसभेत पाठवले. यांना उघडे पडल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी जोरदार टीका राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे. तसंच,राज्य शासनाने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू,’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.
राजकारणात कोणाचीही दुश्मनी नाही
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्या भेटीवरुन राजकारणात खळबळ माजली होती. यावरही नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणी कोणालाही भेटू शकतात उद्या मुख्यमंत्री समोर आले तर मी त्यांना नमस्कार करणार. दोन राजकारणी समोर आले तर बोलूच शकतात. राजकारणात कोणाचीही दुश्मनी नाही. वैचारीक दुश्मनी असू शकते,’ असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times