नाशिक: बदलत्या सामाजिक परिस्थितीत ब्रिटीशकालीन कायद्यांचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच्या या कायद्यांची प्रासंगिकता तपासणे आवश्यक असल्याने हे कायदे बदलण्यासाठी न्यायालयांनीच पुढाकार घ्यायला हवा, असं मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं.

नाशिक येथील न्या.कै.एच.आर.खन्ना सभागृहात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे ‘जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेने’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं. न्यायदान वेगवान व्हावे ही सामान्य जनतेच्या मनातील भावना आहे. त्यादृष्टीने कोणत्या कायद्यात सुधारणा आवश्यक आहेत याबाबत लोकशाहीच्या चारही स्तंभांनी एकत्रीतपणे विचार करण्याची गरज आहे. न्यायव्यसस्थेने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्यास चांगले बदल शक्य आहेत, असं ठाकरे यांनी सांगितलं.

फास्टट्रॅकची आवश्यकता पडू नये

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टकडे वर्ग करण्याची गरज भासू नये, अशी न्यायव्यवस्था आणि समाज घडविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. न्यायालयाची इमारत उभी करताना अशा इमारतीची गरज भासू नये, अशी समाजव्यवस्था निर्माण करण्याचादेखील विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.

निर्भयाला फाशी नाही; मुख्यमंत्र्यांना खंत

आदर्श समाजरचना अस्तित्वात आणण्यास अपयश आल्यास गुन्ह्यांची संख्या वाढून न्यायालयाच्या इमारती कमी पडतील. कायद्यापेक्षा संस्कारांना जास्त महत्व आहे आणि असे संस्कार समाजात रुजविण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगतानाच निर्भया प्रकरणातील दोषींना अजूनही फाशी दिली जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त करताना न्यायव्यवस्था, शासन आणि प्रशासनात समन्वय असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, परिवहन मंत्री अनिल परब, न्या.अनुजा प्रभूदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक, न्या. संदीप शिंदे, भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता ए.एन.एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शेखर नाफडे आदी उपस्थित होते. वकील परिषदेचे समन्वयक ॲड.जयंत जायभावे यांनी वकील परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी ठाकरे यांच्या उपस्थितीत व न्या. गवई यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, भारतीय वकील परिषदेचे अध्यक्ष मन्ननकुमार मिश्रा, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, नाशिक वकील परिषदेचे अध्यक्ष नितीन ठाकरे, ॲड.अविनाश भिडे आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here