मुंबईः राज्यातील दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश मिळतंय. मात्र, पुढचे १५ दिवस राज्यात निर्बंध कायम राहणार आहेत. १५ जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थिती, लॉकडाऊन व तौक्ते चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा यासंदर्भात राज्यातील जनतेला माहिती दिली आहे. तसंच, करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

‘ब्रेक दि चेनचे’ आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत

‘रुग्णसंख्या काही जिल्ह्यात वाढताना दिसतेय आणि ती गोष्टी काळजीची आहे. ते प्रमाण आपल्याला थांबवायचं आहे. त्यामुळं राज्यातील निर्बंध अधिक १५ दिवस कायम राहणार आहेत. त्याबाबत जिल्ह्यानुसार आढावा घेऊन ज्याठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे तिथे निर्बंध कठोर करण्यात येतील. तर, प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करणार,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, करोना संकटाच्या काळात मोर्चे, समारंभ टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दुकानं उघडा किंवा सेवा सुरु करा यासाठी रस्त्यावर उतरु नका. करोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा. करोनाची लाट ही सरकारी योजना नाही. तिच्या विरोधासाठी तुम्ही रस्त्यावर उतरत आहे. हा गैरसमज मनातून काढून टाका. निर्बंध आपण उठवणार आहोत. पण निर्बंध उठवताना घरातील कर्ता गमवला आहे. त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचे आहे. रस्त्यावर उतरु नका तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

‘जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे. जिद्दीनं आणि निश्चयानं बंधनं पाळल्याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच, कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे.हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here