नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या हत्या प्रकरणात आता आणखी नवीन गोष्टींचा उलगडा झालाय. शनिवारी, दिल्लीच्या साकेत कोर्टात रोहित शेखरची आई यांनी आपल्या सुनेवर आरोप केले. रोहीतची पत्नी अपूर्वा हिला रोहितच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. उज्ज्वला तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, अपूर्वानं रोहितशी विवाह केला होता कारण तिला निवडणुकीचं तिकीट मिळवण्याची इच्छा होती.

उज्ज्वला तिवारी यांनी आपले वकील तारिक नासिर यांच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवला. ‘रोहितची पत्नी अपूर्वा हिनं एका योजनेनुसार रोहितशी विवाह केला होता. एन डी तिवारी यांचा मुलगा असल्यानं रोहित आपल्यालाा इंदोर किंवा इतर ठिकाणाहून निवडणुकीचं तिकीट मिळवून देईल, अशी अपूर्वाला आशा होती त्यामुळेच तिनं रोहितशी विवाह केला होता’ असं उज्ज्वला तिवारी यांचं म्हणणं आहे. एक घर मिळवून देण्यासाठीही अपूर्वा हिचं सतत रोहितशी भांडण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

अपूर्वाचा उद्देश सफल न झाल्यानं याच निराशेत तिनं रोहित शेखर झोपेत असताना त्याची हत्या केली. अपूर्वानं रोहितच्या पोस्टमॉर्टेमचाही विरोध केला होता, असाही दावा उज्ज्वला तिवारी यांनी कोर्टात केला. उज्ज्वला तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांची नजर रोहितच्या संपत्तीवर होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन डी तिवारी यांचा पुत्र रोहित शेखर तिवारी १६ एप्रिल रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत आढळला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here