चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर आले होते. अहिल्याबाईंना अभिवादन केल्यानंतर समाज माध्यमातून पडळकर यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव न घेता त्यांच्यावर आणि राज्य सरकारवरही पडळकर यांनी टीका केली. आणि आपल्या अन्य मागण्यांसाठी समाजातील तरुणांनी संघर्ष करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाचा:
पडळकर म्हणाले, ‘ज्या सवलती आदिवासींना मिळत आहेत, त्याच धनगरांना देण्यासंबंधीचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी तरतूद केलेला पैसा गेला कोठे, हेही कळत नाही. हा सगळा काका-पुतण्याचा काळाबाजार आहे. जेव्हा यांच्या हातात सत्ता येते, तेव्हा धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जाते. एकीकडे मराठा आरक्षणासाठी कोर्टात लाखो रुपये खर्चून वकिलांची फौज उभी केली जाते. मात्र, धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रकरणात एक चांगला वकीलही दिला जात नाही. धनगर समाजातील तरुणांनी हे सगळे समजून घ्यावे. आपले हक्क अपल्याला दिले जात नाहीत. मेंढपाळांना देय असलेली रक्कम दोन वर्षांपासून देण्यात आलेली नाही. अशा राज्यकर्त्यांना आपण राजकीय विरोध केल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. जेव्हा धनगर समाज आपल्या हक्कांसाठी मुंबईला वेढा देईल, तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल. अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक संकटांवर मात करून राज्य कारभार केला. त्यांनी राज्य कसे चालविले, याचा अभ्यास जगभरातील राज्यकर्ते करीत आहेत. सर्वांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. आपल्या राज्यातील चोरांनाही काम देऊन त्यांना चांगल्या मार्गाला लावण्याची धोरणे त्यांच्या काळात राबविण्यात आली. सध्या मात्र राज्यातील २५० घराण्यांना पोसण्याचे काम सुरू आहे. मात्र, याद राखा आता बहुजन समाज जागा झाला आहे. आपले हक्क मिळविल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. अहिल्यादेवींची जयंती घराघरातून साजरी करणाऱ्या युवकांनी आज हाच संकल्प केला आहे. आमचे हक्क आम्हाला मिळणार नसतील तर ते हिरावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’ असा इशाराही पडळकर यांनी दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times