मुंबईः ‘१५ महिने सरकार काही न करता गप्प बसले. राज्याने केवळ मागास आयोगाची स्थापना करुन अहवाल जमा करतोय हे सांगितलं असतं तर कोर्टानं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला नसता,’ असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

‘मराठा आरक्षणावर मंत्री खोटं बोलत होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही खोटं बोलत आहेत. जगात खोटं बोलण्याची स्पर्धा झाली तर पहिल्या दहामध्ये राज्यातील मंत्रीच येतील, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. तसंच, सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतचा ऑर्डिनन्स लॅप्स होऊ दिला. मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार सांगत आहेत. हेच मी पाच पत्र देऊन सांगत होतो. मी १५ महिन्यांपासून हेच करतोय. आता तरी जागे व्हा,’ असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘मागास वर्ग तयार केला असता, तर आपल्याला हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. दुर्दैवाने आमचे मंत्री १५ महिन्यांच्या काळात मोर्चे काढण्यात मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते, अशी अवस्था बघायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याऐवजी केसमध्ये लक्ष घातलं असतं, तर आरक्षण टिकवता आलं असतं,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here